
🔸 आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार असल्याचं केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने (CAT) म्हटलं आहे. एवढ्या कमी वेळात गर्दी नियंत्रित करायला पोलिस काही जादूगर नाहीत किंवा त्यांच्याकडे ‘अल्लादिनचा चिराग’ नाही असंही कॅटने म्हटलं. या प्रकरणी सरकारने निलंबित केलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
🔸 18 वर्षांनंतर पहिल्यांदा आरसीबीने आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर आरसीबीकडून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत अचानक चेंगराचेंगरी झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जखमी झाले होते. तर आता या घटनेला कॅटने आरसीबीला जबाबदार धरले आहे. कॅटने जारी केलेल्या आदेशानुसार, आरसीबीने आयपीएल विजयानंतर अचानक सोशल मीडियावर रॅली काढण्यात येणार असल्याची पोस्ट केली होती. या पोस्टमुळे स्टेडियमबाहेर गर्दी जमली आणि पोलिसांना आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळाला नाही. असं कॅटने आपल्या आदेशात म्हटले आहे.
🔸 न्यायाधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले आहे की आरसीबीने पोलिसांकडून कोणतीही पूर्व परवानगी घेतली नाही किंवा त्यांना माहिती दिली नाही. संघाने अचानक सोशल मीडियावर माहिती शेअर केली, ज्यामुळे लोकांची मोठी गर्दी जमली. आदेशात असेही म्हटले आहे की पोलिसांकडे फक्त 12 तासांचा वेळ होता, जो इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी पुरेसा मानला जाऊ शकत नाही.
🔸 दरम्यान चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर बंगळुरुच्या कबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये आरसीबी, डीएनए (इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी), केएससीए प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 105, 125 (1) (2), 132, 121/1, 190 R/w 3 (5) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








